छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण   

 

केरलापेंडा गाव विकास प्रकल्पांसाठी पात्र 
 
सुकमा : छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी १६ नक्षलवादी शरण आले.  त्यापैकी नऊ जण चिंतालनार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केरलापेंडा पंचायतीचे होते .त्यांना पकडून देणार्‍यास २५ लाखांचे सामूहिक रोख बक्षीस ठेवले होते. नक्षलवादी शरण आल्यामुळे संपूर्ण गाव आता नक्षलमुक्त झाले आहे. त्यामुळे ते राज्य सरकारच्या १ कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांसाठी पात्र ठरले असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.
 
माओवादी विचारसरणी चुकीची आणि अमानवीय असल्याची खात्री पटली. त्यामुळे आम्ही शरण येण्याचा निर्णय घेतला, असे नक्षलवाद्यांनी संगितले.  स्थानिक आदिवासींवर अत्याचार झाल्यामुळे नैराश्य पसरले. त्यामुळे एका महिलेसह सर्व १६ नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलिस आणि केंद्रिय राखीव पोलिस दलाच्या अधिकार्‍यांसमोर शरणागती पत्करली, असे सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितले.
 
छत्तीसगढ सरकारच्या ’नियाद नेल्लानार’ (तुमचे चांगले गाव) योजनेमुळे आणि राज्यात नक्षलवाद्यांसाठी शरणागती आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी  धोरण राबविले आहे. त्यामुळे नक्षलवादी प्रभावित झाले होते, असेही ते म्हणाले,माओवाद्यांच्या केंद्रीय प्रादेशिक समिती (सीआरसी) कंपनी क्रमांक २ ची सदस्य म्हणून सक्रिय असलेली महिला रीता उर्फ डोडी सुक्की (३६) आणि माओवाद्यांच्या पीएलजीए बटालियन क्रमांक १ मधील पक्ष सदस्य राहुल पुनीम (१८) यांच्यावर प्रत्येकी आठ लाख रुपयांचे बक्षीस होते. याशिवाय, लेकम लखमा (२८) यांच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस होते, तर आणखी तिघांवर प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बक्षीस होते, असे अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान,   नक्षलवादापासून मुक्त होणारे केरलापेंडा ग्रामपंचायत जिल्ह्यातील दुसरी  ठरली आहे.
 
नक्षलवाद्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये
 
एप्रिलमध्ये, बडेसट्टी येथील सर्व अकरा नक्षलवादी पोलिसांसमोर  शरण आले होते. त्यामुळे गाव नक्षलमुक्त घोषित करण्यात आले होते.  शरण येणार्‍या नक्षलवाद्याला प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली असून  सरकारच्या धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. गेल्या वर्षी, राज्याच्या बस्तर प्रदेशात ७९२ नक्षलवादी शरण आले होते. ज्यामध्ये सुकमासह सात जिल्हे समाविष्ट आहेत. 
 

Related Articles